२०) वडिलांना ४ चुलते होते, त्यातील तिघांची लग्न झालेली नाहीत. वडीलांचे दुसरे चुलते त्यांना २ मुले व वडिल धरून सपूर्ण जमीनीला ३ वारस आहेत तर जमीनीचे वाटप कसे होणार , त्या तिघांच्या जमीनीचे वाटप तीघांत होणार का?
उत्तर - वडिलांचे चार चुलते व तुमचे वडील मिळून एकूण पाच वारस तुमच्या आजोबांना आहेत. जरी तीन चुलत्यांची लग्न झालेली नसली तरी प्रत्येकी एक पंचमांश हिस्सा वारसाने प्रत्येकाला येईल .या व्यतिरिक्त बहिणी असल्यास त्यांचे देखील समान हिस्से असू शकतात. लग्न न झालेल्या चुलत्यांच्या वाटणीची जमीन त्यांच्या हक्कसोडपत्राने उर्वरीत वारसांना देता येऊ शकते .
२१) शेतात जायला गाडी रस्ता नाही बाजूचे शेतकरी जाऊ देत नाही, काय करावे?
उत्तर - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १४३ नुसार नवीन रस्ता मागणी करता येईल यासाठी तहसीलदार यांचेकडे सातबारा व नकाशासह अर्ज करावा.
२२) ७ वर्षापुर्वी २००० चौ फु जागा वाघोली पुणे येथे घेतली पण सातबारा नोंद होत नाही, काय करावे?
उत्तर - शेती नाविकास झोन असेल तर सातबारावर नोंद होणार नाही .परंतु पीएमआरडीएकडे शेती नाविकास झोन प्रिमियम रेट अदा करून बदलून घेता येईल. त्यानंतर झोन बदल झाल्यावर नोंद करता येईल. एकत्रीकरण विरुद्ध व्यवहार असल्याने नोंद करण्यात आली नसेल.
२३) १७ वर्षांपूर्वी जागा खरेदी केली पण अद्यापही रजिस्टर्ड केली नाही कारण ज्याच्या नावाने जागा अगोदर रजिस्टर्ड होती ती व्यक्ती मरण पावली आहे व रोखीचा व्यवहार केल्याची कसलीच नोंद नाही काय करावे मार्गदर्शन करावे.
उत्तर - कायद्यानुसार शंभर रुपये किमतीपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंचा व्यवहार नोंदणीकृत दस्ताने करणे अपेक्षित आहे. आपला दस्त नोंदणीकृत दिसून येत नाही अशा परिस्थितीत वहिवाटीच्या आधारे दिवाणी न्यायालयातून तसेच याबाबत काही अनोंदणीकृत लेखी पुरावा असल्यास त्या आधारे दाद मागता येईल.
२४) विहीर पुर्ण बुजुन गेली. ती सामाईक असुन तिचा उपभोग कोणीही घेत नसुन ती पडीक आहे. तरी तिची नोंद कमी करण्यासाठी प्रक्रिया काय?
उत्तर - सध्या विहीर अस्तित्वात नसल्यास याबाबत तलाठी यांच्याकडे अर्ज करून वस्तु स्थिती पीक पाहणी वेळी दाखवून देऊन नोंद कमी करता येईल .
२५) नमस्कार, मुंबई मध्ये माझ्या आजोबांच्या नावे प्रॉपर्टी आहे ति आता आम्हा तिन्ही भावांच्या नावे करू इच्छितो पण काही कारणास्तव ते दोघे त्यांच्या नावे किंवा आईच्या नावे करु शकतात का. वडिल हयात नाहित पण चुलते आहेत. कृपया योग्य मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
उत्तर - आजोबांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये सर्व मुलांचा समान हिस्सा असतो .त्यानुसार आपल्या वडिलांच्या विषयातील क्षेत्रांमध्ये आपल्या आईचे व आपल्यासह सर्व भावांचे नाव सदर वडिलोपार्जित मिळकतीत लावता येईल. सदर वारस नोंद करताना आपणास आपल्या भावांना व आईला तसेच आपल्या चुलत्यांना नोटिसा काढून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे परस्पर भावांना ,आईचे अथवा त्यांची नावे लावता येणार नाहीत .
२६) आम्हाला बक्षीसात जमीन मिळाली आहे. ज्या व्यक्तीने ती जमीन दिली आहे त्या व्यक्तीचे नाव त्या जमिनीच्या सात बाऱ्यावर चढवलेले नाही. परंतु त्या जमिनीवर आमच्या कडून खटला दाखल केला होता तेव्हा कोर्टाने त्याचा निकाल जमीन खरेदी केलेल्या व्यक्तीच्या बाजूने दिला आहे ( आमच्या बाजूने) . परंतु त्या जमिनीचा मूळ मालक म्हणतोय की ती जमीन त्यांचीच आहे आणि आता त्या ठिकाणी बांधकाम पण जवळपास पूर्ण होत आले आहे. तरी आपण यावर मार्गदर्शन करावे.
( त्या जमिनीचा १९३० पासून आजपर्यंतचा सात बारा आणि फेरफार काढला आहे.)
उत्तर - न्यायालयाने खरेदीदाराच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा जमीन अद्याप खरेदीदाराच्या ताब्यात दिल्याचे दिसून येत नाही .यासाठी ताब्याबाबत डिक्रीसाठी न्यायालयात अर्ज करावा. न्यायालयामार्फत जमिनीचा रितसर ताबा घ्यावा. बांधकाम प्रक्रियेवर न्यायालयामार्फत स्थगिती अथवा मनाई हुकूम पारित करून घेता येईल. बांधकाम अनधिकृत असल्यास याबाबत सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करून अनधिकृत बांधकामांबाबत देखील कारवाई करता येऊ शकते .
२७) नमस्कार, आमच्या वडिलोपार्जित जमिनीची २ वर्षांपुर्वी वाटणी झाली. माझे वडील हयात असताना सातबाऱ्यावर माझे, बहिणीचे, आईचे नाव लागू शकते का? त्याची प्रोसेस काय आहे? बहिणींचे हक्कसोड कागद करण्यासाठी बहिणींना गावी नेणे गरजेचे आहे का?हक्कसोड साठी काय प्रोसेस आहे? मी पुण्यात राहतो, पुण्यातूनच यापैकी कुठलं काम मी करू शकतो? कृपया याची सविस्तर माहिती द्यावी. धन्यवाद.
उत्तर - होय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ८५अन्वय वाटप करता येईल .तसेच नोंदणीकृत दस्ताने देखील आपआपसात वाटप करून घेता येईल .यासाठी शासनाने स्टॅम्प ड्युटी देखील रु १००ठेवली आहे. हक्कसोडपत्र, ज्या तालुक्यातील जमीन आहे त्या तालुक्याचे ठिकाणी बहिणींना हजर राहून करता येईल .
२८) आमच्या शेतजमिनीचा विक्री व्यवहार (साठेकरार )2006 मध्ये झाला होता व त्या वेळेस आम्हाला त्या व्यवहाराची काही रक्कम मिळाली होती, त्यानंतर सरकारने सेझ डिकलर केल्यामुळे खरेदीकरणार्या व्यक्तीने त्या व्यवहाराकडे दुर्लक्ष केले, व आता त्या व्यक्तीने तहसीलदार कार्यालयातून आम्हास मिळालेल्या रकमेचा बोजा सातबारावर चढविण्यासाठीची नोटीस पाठविलेली आहे.(साठेकरारात या व्यवहारासाठी वेळेचे बंधन राहणार नाही असे नमूद केले आहे) तरी इतक्या प्रदिर्घ कालावधी नंतर तो व्यवहार रद्द / कालबाह्य होऊ शकतो का आणि रद्द होऊ शकत असेल तर त्यासाठी काय करावे लागेल.
उत्तर - साठे करार नोंदणीकृत असल्यास त्याची नोंद सातबारावर घेणे क्रमप्राप्त आहे .साठे करारातील अटी व शर्तीच्या अनुशंगाने तो रद्द करता येईल का हे निश्चित होईल .
२९) वडीलोपार्जित प्राँपर्टीला वडिलांनी बक्षीस पत्र करून देणेसंदर्भात काय कागदपत्रे लागतील?
उत्तर - दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत बक्षीसपत्र करावे लागेल .त्यासाठी अद्ययावत सात बारा उतारा आवश्यक आहे इतर कागदपत्रांबाबत निबंधक कार्यालयात संपर्क साधावा.
सातबाराची प्रत्येक पोस्ट पुढील ब्लॉगवर वाचू शकता -
http://saatbaara.blogspot.in
__________
ज्ञानभाषामराठीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन तुम्हाला मराठीतूनच केले जाईल. असे विविध अभिनव उपक्रम 'सर्वत्रमराठी' या भव्य उपक्रमाचा भाग आहेत. यातून लोकभाषा म्हणून सर्वच क्षेत्रात मराठी अधिकाधिक सक्षम करणे आणि इतर भाषांवरील परावलंबित्त्व कमी करणे त्याचप्रमाणे वाट चुकलेल्या नवपालकांना मराठी शाळांकडे वळवणे हा उद्देश आहे.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान